Wednesday 13 November 2013

सद्विवेक


सद्विवेक

सूखाचे सर्व सोबती... सगेसोयरे नातीगोती..!

दु:ख मात्र असुदे तुझे एकट्याचेच सांगाती..!!

 

        जिवनात आलेल्या आनंदाच्या, सुखाच्या क्षणात माणूस इतरांना सहजपणे सहभागी करून घेतो, इतरांच्या आनंदात तितक्याच समरसतेने सामील ही होऊ शकतो. परंतु वेदना, दु:खात मात्र स्वतः च्या वेदना, स्वत:चं दु:ख तो आतल्या आत लपवण्याचा, दडवण्याचा प्रयत्न करीत असतो. मानवी स्वभावाच्या सहजप्रव्रत्तितून येणाऱ्या अनुभूति, वेदना या संवेदनशील मानसाला आतून कुठेतरी हलवत असतात. त्या त्याला अस्वस्थ करून सोडतात. हीच अस्वस्थता त्याची झोप मोड  करत असते. जशी प्रथ्वीच्या उदरात अशीच अस्वस्थतता सतत खळबळत असते.! कधीतरी ती उत्पात बनंत लाव्हारसाच्या रूपानं आतून धक्के देत ज्वालामुखीचं उग्र रूप धारण करंत बाहेर  पडत असते... त्यावेळी होणारी थरथर, विनाश हा आपला प्रताप कांही काळ का होत नाही दाखवत असतो. परंतू विश्वाच्या अमर्याद आयुष्यात तो काळ अगदीच नगण्य असतो. कालांतराने परत प्रथ्वीवरचं जीवनचक्र पूर्ववत अखंडपणे फिरायला लागतं. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव होत असतो, हिरवळ फुटत असते आणि मग ती अपल्याच मस्तीत मदमस्तपणे लहरत लहरत परिसराला आपल्याकडे आकर्षित करते, त्याला प्रसन्नता बहाल करत असते. तशाच मानवी जीवनातील वेदना, दु:ख हे क्षणिक, तत्कालीक असते. मात्र ते पचवायची क्षमता आंगी बाणायला शिकलं पाहिजे.

            या वेदना, दु:खात माणूस इतरांना सहभागी करून घेवू इच्छित नाही, एकाकीपणे आतल्या आत घुसमटत असतो, अंतरी आक्रंदत जगनं हे निरर्थक वाटायला लागतं. परंतू त्याला एक नैसर्गिक देनगी मिळालीय ती प्रतिभेची. प्रतिभेच्या माध्यमातून तो प्रकट होत असतो, साहित्यातल्या कुठल्या न कुठल्या रूपातून. या साहित्याची  उत्पत्तिच  वेदनेतून  झाली आहे असं मानलं जातं. क्रौंचवधाच्या वेदनेतूनच पहिलं काव्य अवतरीत झालं आहे! म्हणूनच पु. ल. नी म्हटलं आहे जगण्यासाठी काय करायचं हे कुणिही शिकवू शकेल, पण "कशासाठी जगायचं" हे फक्त साहित्यच शिकवू शकेल. या वेदना माणसाची तत्कालीक का होत नाही झोप उडवतात हे निश्चित. जीवनमुल्यांना कुठनाकुठं ठेस पोहचली की तो आतुन हादरतो, अस्वस्थ होतो. परंतु मानसाला सद्सदविवेकबुद्धी हा गूण त्या निसर्गानंच बहाल केला आहे. या सद्सदविवेकबुद्धिने तो सत्यासत्याचा, भल्याबु-याचा, बरोबरचुकीचा परामर्श घेऊ शकतो आणि असत्त्यावर सत्त्याचा, बू-यावर भल्याचा मार्ग त्याला सापडंत असतोच असतो. मग त्याची अस्वस्थता कुठल्या कुठे नाहिशी होते. असेच कांही प्रसंग मानसाच्या आयुष्यात येत असतात. अशा प्रसंगाने झोप निश्चित चाळवली जाते, जिवनमुल्ये संभ्रमित होतात. मानसाच्या मनात पुरता गोंधळ उडतो, तो अस्वस्थ होतो, सारासार विचारही कुंठित होतो. अशावेळी अनर्थकारी परिणामही कदाचित घडण्याची भिती उद्भवू शकते. या संदर्भात "जगा... पण सन्मानानं!" या पुस्तकातून शिव खेरा यांनी दिलेले लेखापालाचे ऊदाहरण फार समर्पक आहे. त्यांनी ते सुंदररित्या आपल्या पुस्तकात उद्धृत केलं आहे. तो लेखापाल निष्प्रह, सदवर्तनी, जीवनमुल्ये जपत काम करणारा. त्याला एकदा त्याच्या सद्सदविवेकबुद्धिला न पटना-या कामाविषयी आमिष दाखवत विचारना केली गेली, त्याच्यावर सद्सदविवेकबुद्धिचा प्रभाव असल्यामुळे ते काम स्विकारण्यास त्याने तत्काळ होकार दिला नाही. तरीही आमिषाच्या लोभाला बळी पडत विचार करण्यासाठी अवधी मागितला. आपल्या तत्वापासून तो विचलित झाला, त्याच्या मनाचा अस्वस्थतेने ताबा घेतला ... आणि ते आमिष त्याचा पाठलाग करीत घरापर्यंत पोहोचले! त्याने त्याची झोप चाळवली, रोजच्याप्रमाने आईच्या हातचे जेवन करून आंथरूणावर पडला पण आता झोप कुठल्याकुठे पळाली होती. प्रलोभनाचा अविचार आणि सद्सद विवेकबुद्धिचं द्वंद्व त्याच्या अंतरमनात जुंपलं होतं! अस्वस्थता वाढत होती, झोप पुरती चाळवली गेली होती! उशीर पर्यंत त्याच्या खोलीत दिव्याचा प्रकाश पाहून त्याची अशिक्षित(?) आई खोलीत आली. आईची चाहूल लागताच तो उठला आणि तथाकथित रूढ अर्थाने अशिक्षित आईला त्याने  परिस्थिती समजावत सल्ला विचारला, " आई मी काय करावं असं तुला वाटतं?" त्या मातेचं उत्तर त्याच्या डोळ्यात अंजन घालनारं होतं, "आरं बाबा मला काय कळतंयरं या तुमच्या येव्हारातलं. पण मला आडानीला येवडंच कळतं बग, ज्या कामामुळं झोपमोड व्हत आसंल ते काम करावंच कशाला? मला तू हमेशा सारखाच शांत चित्तानं झोपल्याला बघायचंय!" बस्स त्या संभ्रमित लेखापालाला उत्तर मिळाले, तो जे समजायला हवं होतं ते समजला. जे तत्वज्ञान पुस्तकातून, मोठमोठ्या धर्मग्रंथातून, प्रकांड पंडिताकडून मिळायला, शिकायला त्याला उभं आयुष्यही कमी पडलं असतं ते तत्वज्ञान त्याला त्या अशिक्षित ठरवल्या गेलेल्या त्याच्या  आईकडून  एका वाक्यातून उमगलं होतं! कारण ते समजायला त्याची सद्सदविवेकबुद्धि जाग्रत होती...  हेही तितकंच खरं.

       आपल्या आयुष्यातही लेखापालाच्या आयुष्यात, एका टप्प्यावर आलेला प्रसंग या ना त्या रुपांत येत असतोच. मानवी स्वभाव हा काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार या षड्रिपुंनी ओतप्रोत भरलेला असतो. या शत्रूं पैकी एक जरी शत्रू आपल्या मनावर हावी झाला, मनाच्या मानगुटीवर बसला तर होत्याचं नव्हतं व्हायलां कांहींच वेळ लागत नाही! होत्याची परिस्थिति निर्माण व्हायला अनेक तपं घालवावी लागतात! जशी विश्वनिर्मितीसाठी युगेनीयुगे जात असतात तशी. पण विनाशाला, प्रलयाला क्षणाचाही काळ पुरेसा असतो. निर्माणाला फार दिव्यातून, कष्टातून, यातनेतून जावं लागतं म्हणूनच हे निर्माण हळुवार जपायला हवं. हे निर्माण जपण्यासाठी प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, समर्पण, आदरभाव इत्यादि गुणांची आवश्यकता असते. या गुणांमुळेच नातीगोती, गोतावळा टिकवण्यासाठी मदत होत असते. नात्यांमधे ओलावा टिकवून धरला जात असतो. तो ओलावा जपता आला पाहिजे, नाही जपता आला तर सुपिक जमीन कोरड्या रखरखीत माळरानात रूपांतरित होउन जाते, या माळरानाला सावली देणारे व्रक्षही खुरटले जातात! ते खुरटलेपण कसल्याच सावलीच्या कामाचं रहात नाही. मग हे माळरान आपल्याला खायला उठते... पाय होरपळून जातात! अंगाला उन्हाचे चटके असह्य होतात! तद्वत जीवन नकोसं वाटायला लागतं!

          निसर्गाने जसे षड्रिपू निर्माण केलेले आहेत तशेच त्यांच्यावर मात करण्यासाठी अस्त्रेही बहाल केलेली आहेत मानवाला जन्मासोबतंच. षड्रिपुच्या अस्त्रांची होळी करण्यासाठी सर्व धर्मांनी आपापल्या धर्मग्रंथांमधे कांहीं समसमान तत्वांची शिकवण दिली आहे, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मश्चर्य, अपरिग्रहः हीच ती अमोघ अस्त्रे. पंचशील नावाने ती ओळखली जातात, हे पंचशील आपले शिल जपायला, ते व्रधिंगत करायला शिकवतं. जीवन सम्रद्ध करायला, त्यात आनंदपर्व निर्माण करायला ही आयुधं शिकवतात. प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, समर्पण, आदरभाव या गुणांनी ती पाजळायला, हाती पेलायला शिकलं पाहिजे. या अस्त्रा मध्ये फार मोठी शक्ति आहे. अगदी पर्वताला पाझर फोडण्या इतपत प्रबल... पण ती आज बोथटताहेत स्वार्थलोलूपतेमुळे, त्यावर गंज चडतोय आपमतलबी व्रत्तिच्या आंधळेपणाचा! आज घणघोर युद्ध मांडलय या आसूरीव्रत्तिनं!! या प्रव्रत्ति अशाच बळावंत राहिल्या, फोफावत राहिल्या तर समाजातले विखुरलेपण आणि विरळपण वाढत जावून विनाश अटळ ठरतो. म्हणून हे विखुरलेपण आनखीन विखुरले जावू नये, ते सांधलं गेलं पाहिजे. ते सांधायला मात्र आपणंच सुरूवात करायला हवी. याची जाणीव तर सर्वांना असते पण......

 

कळतं पण वळंत नसतं, म्हणूनच जग दु:खी असतं...

उसवत्याला जो टाके घालतो, त्याचंच जगनं जगनं असतं..!

 

         शेवटी रूसो म्हणतोना, " खरं स्वातंत्र्य म्हणजे कांही प्रमाणात सद्सदविवेकाने स्वत:वर घालून घेतलेली बंधने.... तेंव्हा या सद्सदविवेकालाच जीवनाची सावली करून आयुष्याची पालवी पुन्हा पुन्हा बहरत ठेवू."

Saturday 9 November 2013

नेणीवांची पानगळ ते जाणिवांची पालव

    मध्यमवर्ग ....
नेणीवांची पानगळ ते जाणिवांची पालव

"अवघे विश्वची माझे घर
ऐसी मती जयाची स्थीर
किंबहूना चराचर
आपण जाहला."

सतरा वर्षाच्या कोवळ्या वयाने तेराव्या शतकात दिलेले हे  "अध्यात्मिक जागतिकीकरण"....आणि आज एकविसाव्या शतकात एका सतरा वर्षाच्या पोराने सत्तर वर्षाच्या बापाला घराबाहेर काढून दाखवलेलं "स्वार्थाचं भौतिकीकरण" मध्यमवर्गियाच्या सुखवस्तू "चौकटीचे" खांब उध्वस्त करतोय....!!
"भावार्थदीपिकेचं" "स्वार्थदीपीकेत" होणारं अवतरण थांबवणारा ज्ञानेश्वर व्हायची किंमत आपण मोजू शकतो का?? वेळीच याचं उत्तर शोधलं नाही, तर येणारा काळ असंख्य प्रश्न उभा करेल.... म्हणून तर हा विचार प्रपंच...
             "वसुधैव कुटुम्बकम" ही हिन्दू धर्माची शिकवण, वसुधेवर असणाऱ्या अखिल जीवमात्राशी नातं जोडायला सांगनारी. किती उदात्त भावना ओतप्रोत भरलेली आहे या संकल्पने मध्ये. यामुळेच तर हिन्दू संस्कृती जगभरात वंदनीय ठरली आहे. परंतू मध्यंतरीच्या काळामध्ये परकियांची भारतवर्षावर अतिक्रमणे होत राहिली, परकियांची संस्कृती आणि मुळ संस्कृतीमध्ये  देवाणघेवाण होणे अपेक्षित होते. ज्यामुळे संस्कृती अनखिन सम्रद्ध व्हायला चालना, मदतच झाली असती...पण तसं न होता संस्कृति संस्कृतीमध्ये संघर्ष होऊ लागला! धार्मिकतेमधे इर्षा, कट्टरवाद बोकाळंत गेला..! अन् मानुसंच मानसाचा शत्रू बनत गेला! भौतिकवाद, चंगळवादाचं रान फोफावत गेलं. अर्थातच स्वार्थ हा प्रत्येकाच्या मानगुटीवर बसला तर नवल कसलं मानायचं..! या स्वार्थाच्या राक्षसाने जगाला काबीज केलं ! देश देशाचा शत्रू बनला, राष्ट्राराष्ट्रांत संघर्ष सुरू झाले. ते लोन अगदी घरापर्यंत पोहचायला वेळ लागला नाही! आपसांत कलह सुरू झाले. कांही परिहार्य कांही अपरिहार्य कारणामुळे एकत्र कुटुंबे विभागली गेली. कुटुंब हे पतीपत्नी आणि मुलं असं त्रीकोणी वा चौकोनी आकार घेत गेलं. आता या कुटुंबात जेष्ठांचं स्थान डळमळीत होत चाललय. ही अत्यंत चिंतेची बाब बनत चाललीय. अर्थार्जनासाठी उरफुटेपर्यंत धावपळ चालली आहे. या धावपळीत कुटुंबातील जीवाला जीव देणारी आपली मानसं दुरावली जात आहेत, आपणंच आपल्यांना परकं करतोय याचं भानही रहात नाही. आपल्या पश्चात बाळाला प्रेमाची उब देणारी, त्यांच्या जिज्ञासाची भुक भागवनारी अनुभवी जाणकार मंडळी दूर जात आहेत. बाळाचा हात धरून त्याला पोटाशी धरंत त्याचं संगोपन करायला आपल्याला वेळ नसतो! मग बाळाचा  आपल्या हातातून हात केंव्हा सुटून ते दूर जातो हे कळंतही नाही. कळते तेंव्हा परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते! नसुधारण्या पलीकडे.
      कौटुंबिक स्तरांवर ही स्थिती तसेच सामाजिक स्तरावर ही वेगळेपण नसते. "व्यष्टी तशी समष्टी" हा जणू अलिखीत नियमच आहे! समाजातील असे कितीतरी प्रश्न आपल्या पुढे आ वासून उभे आहेत. अज्ञान, दारिद्रय यामुळे दीनदलीतांच्या गरजांची ससेहोलपट होत असते. पण हेच अज्ञान,दारिद्रय (वैचारिकही) कांही स्वार्थी, संधीसाधू लोकांसाठी फायद्याचे, उपयोगाचे असते गरजुंना आपल्या दावणीला बांधलं आणि एकदाका त्यांना दावणीची सवय झाली की ते बांधले काय किंवा मोकळे सोडले काय ते फिरून फिरून गोठ्यात दावणीला येणारंच याची खात्री या संधी साधूंना असतेच. या व्रत्ती मुळेच विना सायास सुख, चैन,आराम याची लयलूट करता येते. जाणीव पुर्वक पर्यावरणाचे असंतुलन, आर्थिक लाचारी त्यामुळे होणारा विद्रोह, बंडखोरी, लांडीलबाडी, दरोडेखोर व्रत्ती याकडे डोळेझाक केली जाते. मग त्याचा परिपाक अन्याय, अत्याचार अराजकता  यांना  खतपाणी  घालण्यात होतो.आणि हे अन्याय अत्याचाराचे अस्त्र बुमरँग प्रमाने उलटुन आमच्यावरच घाव घालंत असते.आम्ही स्वतःला खुप सुज्ञ, जाणकार, उच्चविद्या विभूषित, धनाने, गुणाने संप्पन्न समजत असतो. त्यामुळे इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत ही भावना मनात कायम घर करून बसलेली, त्यामुळेच की काय सुरवंटाने स्वत:ला कोषात गुंतवून घेतल्या सारखे आपण भले आपले विश्व भले म्हणून घरात कोंडुन घेतलेले! ना कोणासी संपर्क ना कोणासी जवळीक. एक गमतीदार उदाहरण ऐकलेले आठवते, एका सेमीनारमध्ये दोन सहभागींची ओळख होते, सेमिनार आटोपून दोघे परतीच्या प्रवासाला निघतात, रेल्वे स्टेशनवर जाण्यासाठी रिक्षा शोधत असतांना दोघांना कळते की दोघेही एकाच रेल्वे स्टेशनला जाणार असतात, तिकीट काऊंटरवर समजते की दोघेही एकाच शहराकडे जात आहेत.स्टेशन वर उतरल्यावर घराकडे जाण्यासाठी एकाच रिक्षा मध्ये बसतात. रिक्षातून एकाच  वसाहती जवळ उतरतात, दोघांनाही अश्चर्य वाटते. ते एकमेकांना विचारतात, "अरेच्चा तुम्हीपण इकडेच रहाता काय, कोणत्या इमारती मध्ये?" एकाच अपार्टमेन्ट मध्ये दोघे रहात असतात, अपार्टमेंट मध्ये पोहचल्यावर घरांचे नंबर विचारतात तेंव्हा कळतं की ते तर एकमेकांचे शेजारीच असतात!! अशी स्वतः भोवती एक अद्रश्य कुंपण घालून घेतलेले आम्ही लोक! केवळ आपल्या अन आपल्या कुटूंबाचा उत्कर्ष यातंच गुरफटून घेतलेले.खरा उत्कर्ष काय आहे याची परिभाषा न कळालेले! पैसा मानमरातबासाठी धावत सुटलेले! धावतांना जीवघेण्या स्पध्रेत उतरलेले!! धावताना यांचे लक्ष जमिनीकडे नसतेच मुळी.आकाशाकडे पहात जेंव्हा धावनं(?) चालू असतं तेंव्हा पायाखालची वाळू हळूहळू सरकत चाललेली तेंव्हा कळत पण नसते. या धावण्याच्या शर्यतीत होते दुर्लक्ष पोटच्या लेकरांकडे, सोन्यासारख्या कुटुम्बीयांकडे, त्यावेळी कळंत असतं पण वळंत नसतं! जेंव्हा कळतं तेंव्हा फार फार उशीर झालेला असतो! पायाखालची वाळू सरकलेली असते, आकाशापर्यंत हातही पोहचत नसतात.समुद्रामध्ये गटांगळ्या खाव्या लागतात तेंव्हा पदरी निराशा येते! आपले कुणाला म्हणावे तर त्यांना आपणच दूर सारलेले असते. आपली मुलंही त्यावेळी दुरावलेली असतात! कारण ज्यावेळी त्यांना पाहिजे असते मायेची उबजिज्ञासांची उकल नेमके त्यावळी पैसा, प्रतिष्ठेच्या म्रगजळापाठीमागे धावत असतो उर फुटेपर्यंत, परंतू म्रगजळ तर हाती सापडंत नाहीच. उर मात्र फुटून जातो! "तेल गेलं तुप गेलं हाती धुपाटणं आलं." अशी गत होउन जाते. मुलं आजच्या दुनियादारी मध्ये गुरफटत गेलेली असतात तुमचं ऐकायचं तर सोडाच तुम्हालाच ते वेडे ठरवतात! वेड्यासारखं धावतांना परिणामाची जाणीव आम्हाला राहिलेली नसते. कारण त्यावेळी डोळ्यावर पट्टी  बांधलेली असते गांधारी सारखी वेड्या प्रेमाची! फसव्या प्रतिष्ठेची परंतु जेंव्हा डोळ्यावरची पट्टी निघते तेंव्हा अवतीभवती संहार द्रष्टिपथात दिसतो आणि पसरलेला असतो अंधार चहूकडे. पण त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. परिस्थिती हाताबाहेर गेलेली असते. त्या अंधारात हरवलेली असतात आपली माणसे आपली संतती. होतो मग भ्रमनिरास! भ्रमाचा भोपळा फुटतो पण तो भोपळाही कांही कामाचा नाही उरंत! मग खापर फोडलं जातं दैवाच्या माथ्यावर सोइस्करपणे!!
       पण दैव दैव म्हणजे तरी काय असतं, आपण हरलेल्या परिस्थितीत आपलं मन देखील हरू नये आणि पुढचे सर्वच मार्ग खुंटले जावू नयेत, बंदही होवू नयेत म्हणून आपणास दिलासा मिळावा, आपण परत उभारी घ्यावी अन्  फिनिक्स प्रमाणे परत त्या अंधारात हरवलेल्या  प्रकाशवाटा शोधायला बळ मिळावं  म्हणून आपल्या संस्क्रुतिने दिलेली ती शिकवन आहे. म्हणून परिस्थिती समोर हार न मानता परिस्थिती ओळखून तिचा मुकाबला करायला शिकलं की परिस्थिती आपली गुलाम बनते! मात्र परिस्थितिला शरण जायचं की परिस्थितिवर मात करायची हे मात्र ज्याच्या त्याच्या हातातच असतं.

Thursday 17 October 2013

झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही ना..!!


झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही ना..!!




      श्रद्धेला डोळसपणे पहाण्याचा आग्रह अट्टहास धरणार्‍या डॉ. नरेंद्र दाभोळकर नावाच्या श्रद्धेचातिमिरातून प्रकाशपर्वाकडे घेऊन जाणार्‍या सूर्योदयाच्या वेळीच खून व्हावा? आणि तोही सद्भावनेची शपथ घ्यावयाच्या सद्भावना दिवशी’? आणखी एक दुर्योग राखी पौर्णिमेचा रक्षा बंधनाचा’. ज्या दिवशी महाराष्ट्रच नव्हे तर अवघा भारत देश बहिणीच्या रक्षणाचा बहिणीला विश्वास देतोय त्या दिवसाचा. श्रद्धाही मानवी जीवनास प्रेरणादायी जिवो जीवस्य जीवनमची शिकवण देणारी एक शक्‍ती आहे आणि या शक्तीच्या बळावर त्यांच आयुष्य, जीवन हे खर्‍या अर्थाने मानवीठरतं.  हीच श्रद्धा जर जीवनातून वजा केली, तर उरत ते पशुत्व. डॉ. नरेंद्र दाभोळकरही श्रद्धेच्या विरोधात कधीच नव्हते. त्यांचा आग्रह एवढाच होता की, श्रद्धा जरूर बाळगा पण डोळस होऊन.  पुजा, सण, उत्सव जरूर साजरे करा पण ते मानवी जीवनास पूरक ठरणारे असावेत याची काळजी घ्या. या उत्सवामुळे पर्यावरण मग ते ध्‍वनी, जल, वायु इ. द्वारे बिघडून मानवी आरोग्यास धोका ठरू नये. तुमच्या ज्या श्रद्धा आहेत, विश्वास आहे तो निर्विकल्प, निरीछ आणि विवेकी असावा. मग तो समाज रचनेस पूरक आणि साधक ठरेल. अंधश्रद्धा ज्या माणसांना कंगाल करून सोडतात, त्यांना जीवनातून उठवतात, त्यांना बळी जावू नका. श्रद्धेच्या पाठीमागचं विज्ञान ओळखायला हवं. मग कुणाच्या भजनी लागावच लागणार नाही. जेव्हा आपण स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार म्हणून घेतो तिथच अराजकतेची बीज रुजतात. त्याची पाळंमूळं खोल जाऊन त्याचा विषवृक्ष इतका फोफावतो की, तो उपटणं अशक्यप्राय होऊन जातं. विवेक सुटून स्वार्थ लोलुपता वाढीस लागते, ही स्वार्थ लोलुपता इतकी कल्पक असते की, तिने समाजमनाचा पुरेपूर अभ्यास केलेला असतो, तिला माहित असतं दुनिया झुकती है”. दुर्दैवानं ही दुनिया सुद्धा स्वतःची बुध्दी गहाण ठेऊन झुकणारीच असते. म्हणूनच ती अंधश्रद्धेला बळी जाते.



      श्रद्धेला कुणीही ही नाकारलेलं नाही आणि नाकारू ही नये. परंतु, मुकी बिचारे कुणीही हाकाही प्रवृती श्रद्धेला डोळसपणे पाहू देत नाही. डॉ. नरेंद्र दाभोळकर हा डोळसपणा जागवण्यासाठी अविरत झटत होते. हा डोळसपणा जागवणार्‍यांचा त्यांच्या इतकाच इतिहास फार मोठा आहे. यदा यदा ही धर्मस्य ग्लांनिर्भवतीची शिकवण देण्यापासून पुरातन आहे. या ग्लांनीतून समाजाला जागे करण्यासाठी प्राण पणाला लाऊन लढा देणार्‍या फार पुरातन काळातील इतिहासात जाण्याची आवश्यकता नाही. समाज सुधारणेसाठी लोकहितवादी पासून फुले, शाहू, आंबेडकर, बाबा आमटे ते थेट दाभोळकरा पर्यंत शब्दशः प्राणपणाला लाऊन लढा दिला आहे. संत कबीरांपासून ते ज्ञानेश्वर, एकनाथ, नामदेव, तुकाराम, रामदास ते थेट गाडगेबाबा पर्यंत संतांच्या मांदियाळीने श्रद्धेला जपत अंधश्रद्धेवर घाव घालण्यासाठी स्वतःवर घाव झेलले आहेत. घाव झेलता झेलता कित्येकांचे बलिदानही गेलेले आहे. परंतु, दैवदुर्विलास असा की, हा बळी ज्या ज्या वेळी जातो त्या त्या वेळी कुंभाकर्णाला जाग आल्याप्रमाणे तात्कालिक सभा, मोर्चे, लढा उस्फुर्तपणे उभारला जातो. निषेध, घोषणा देत अंगुलीनिर्देश करत विरोध प्रदर्शित केला जातो. पण लक्षात घेतलं जात नाही की, एक बोट जेव्हा आपण दुसर्‍याकडे दाखवतो त्या वेळी चार बोटे आपल्याकडे ही असतातच ना!

      आजही तेच घडतय. डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येसाठी आम्ही जबाबदार धरतोय सरकार, पोलिस यंत्रणा, सामाजिक/धार्मिक संघटनांना. ज्याच्या त्याच्या मर्यादा ठरलेल्या असतात त्यांना त्यांच्या विचारसारणी प्रमाणे, कार्यपद्धतीप्रमाणे काम करणे भाग पडते. नव्हे ते त्यांचे कर्तव्य असते. हे खरे असले तरी याचेही भान असायला हवे की, आपण कोणाच्या तरी दबावाखाली आपल्या कर्तव्यात कसूर करतोय का? डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या पोलीस स्टेशन परिसरात होते, हत्येपुर्वीचे व नंतरचेही सीसीटीव्‍ही चे फुटेज उपलब्ध आहेत. पोलीस पथके ही कार्यरत आहेत तरीही तपासासाठी अक्षम्य विलंब का व्हावा? आपली ख्याती आहे की, आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांचा शोध लावून त्यांना शिक्षा ही देवू शकतो. मग दाभोळकरांच्या हत्या-याच्या तपासकामी एवढा विलंब का व कशासाठी? हा सामान्य जनतेसमोर प्रश्न उभा ठाकल्यास नवल का वाटावे? विज्ञान, तंत्रज्ञांनामुळे अवघं जग मुठीत आलय याचा दावा आपण मोठ्या गर्वाने करतोय! हा दावा कितपत खरा आहे? याचं आत्मपरिक्षण करण्याची वेळ आज येऊन ठेपलीय. सभा, निषेध, मोर्चे जरूर काढावेत ते समाजाच्या जिवंतपणाच द्योतक आहे. परंतु, हा जिवंतपणा, जागृतपणा क्षणीक आणि फसवा ठरू नये! दुसर्‍याला चिमटे काढत कालापव्यय करण्यापेक्षा जरा स्वतःलाच चिमटा काढूया की, आपण स्वतः कितपत जागृत आहोत? कितपत डोळस आहोत? हा जागृतपणाचा, डोळसपणाचा धडा घेतला तरच आपला हा लढा जीवंत ठरेल. नाही तर पुन्हा कुंभकर्णाप्रमाणे पुढील दुर्दैवी घटना घडेपर्यंत झापडबंद कुंभकर्णी झोप आपल्याला लागणार नाही याची काळजी आपल्यालाच घ्यावी लागेल!  

       डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर एक आशादायी चित्र निश्चित दिसून येत आहे. या चळवळीकडे सत्यशोधक व सकारात्मक दृष्टीने कार्यकर्ते सहभागी होत आहेत. या सह्भागाला कृतिशिलतेची जोड मिळाल्यास चळवळ निश्चितच यशस्वी होईल आणि ती तितक्याच नेटाने पुढे जाईल.